मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; डॉ. सुजय विखे यांचे मतदारांना निवडून देण्याचे आवाहन

मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; डॉ. सुजय विखे यांचे मतदारांना निवडून देण्याचे आवाहन
शेवगाव (प्रतिनिधी) – देशात पंतप्रधान मोदींचीच हवा आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी मतदार हे भाजपलाच मतदान करून मोदी याना पंतप्रधान करणार आहे. त्यांचा विकासाचा अशवमेध कोणीच रोखू शकत नाही, असे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
महायुतीच्यावतीने शेवगांव तालुक्यातील घोटण येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले याच्यासह, काकासाहेब नरोडे, अंबादास कळमकर, संजय कोळगे, बबन भुसारी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाचा गतीमान विकास केला आहे. अनेक योजनांच्या मार्फत त्यांनी तळागळातील लोकांचा विकास करून दाखविला असून ३० कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून मुक्त केले. मोदींच्या हमीवर देशातील नागरिकांचा विश्वास असल्याने तिसऱ्यांदा त्यांनाच पंतप्रधान पदावर बसविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ विखे याना विजयी करा : घुले
देशाला कणखर नेतृत्व देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशात कुठलाही पर्याय नाही. यामुळे महायुतीचा उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. खा. डॉ. सुजय विखे ह्यांनी मागील पाच वर्षात आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. यामुळे नगरच्या विकासासाठी ते पंतप्रधान मोदींच्या टीम मध्ये आवश्यक आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांना विजयी करा असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी मतदारांना केले.