मतदारसंघाचा विकास हेच ध्येय, जनतेच्या हितासाठीच काम करणार : डॉ. विखे

मतदारसंघाचा विकास हेच ध्येय, जनतेच्या हितासाठीच काम करणार : डॉ. विखे
पाथर्डी (प्रतिनिधी) – मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून विकास कामांना गती दिली. अडीच वर्षाचा कोविड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो. जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यातील संवाद सभेप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे, दिनकरराव पालवे, एकनाथ हटकर, विजय गवळे, साहेबराव गोळे, महादेव कुटे आदी उपस्थित होते. डॉ. विखे पाटील म्हणाले की, मागील पाच वर्षात मी जिल्ह्यातील विविध प्रश्नांची उकल केली असून रस्ते, पाणी, उद्योग विकास, पर्यटन, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे, कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील गावागावात विकासकामांसाठी निधीची पुर्तता केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी काम केले आहे.मला जिल्ह्याच्या विकासासाठी काय करावे लागणार याची जाण आहे.
विखे यांनी जिल्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले : आमदार मोनिकाताई राजळे
डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात दिलेल्या कामांची आश्वासने पुर्ण केली आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. विखे पाटील हे सत्तेत असणे आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करा असे आवाहन आ. मोनिका राजळे यांनी मतदारांना केले.