इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट ४ जून, भाजपचं सत्तेत येणार : मोदी

इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट ४ जून, भाजपचं सत्तेत येणार : मोदी
काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार ! सुरक्षा व विकास हीच भाजपाची गॅरंटी
सुनिल कोल्हे
अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभेचा आज तिसरा टप्पा असून इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे, ४ जून नंतर त्यांना झेंडा उचलायला देखील कोणी मिळणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यास मुस्लिमाना आरक्षण देणार आहे, जे कि, इतर समाजाचे आहे, देशहितासाठी त्यांनी कोणताच मुद्दा हाती घेतलेला नाही, नेहमीच काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे. जनतेचा भाजप आणि मित्रपक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, देशाची सुरक्षा आणि विकास हीच मोदींची गॅरंटी आहे. असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली.

देशभरात लोकसभेचा बिगुल वाजलेला असताना आज अहमदनगर (अहिल्यानगर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. दक्षिण अहमदनगरचे महायुतीकडून असलेले भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी ही प्रचार सभा घेण्यात आली.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय अर्थ मंत्री भागवत कराड, मंत्री दादा भुसे, खा, सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, आमदार राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे तसेच जिल्ह्यातील भाजप आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.

इंडिया आघाडी वेगवेगळे कट रचून व्होट बँकेच्या तुष्टीकरणाचे काम देशात करत आहे. काँग्रेसने तर आपला जाहीरनामा हा मुस्लीम लीगनुसार तयार केला आहे, असा आरोपही यावेळी पंतप्रधान मोदींकडून करण्यात आला. विकास, गरीबांचे कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभीमान हे भाजपाचे आणि एनडीएचे मुद्दे आहेत. पण काँग्रेस या कोणत्याही मुद्द्यावर बोललायला तयार नाही, ते गरीबांचे कल्याण या मुद्द्यावर का बोलत नाहीत, काँग्रेसने सुरु केलेल्या समस्या संपवून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सुरक्षा आणि विकास दोघांची गॅरंटी दिल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले. तसेच मोदी सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. अहिल्यानगर- सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे, एअरपोर्टचा विकास करणे याकडे आमचे लक्ष आहे. शिर्डीच्या भाविकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु केली आहे, अधिकच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

काँग्रेस मुस्लिमाना आरक्षण देणार : मोदींची नगर, बीडच्या सभेत इंडिया आघाडीवर टीका
देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास काँग्रेस मुसलमानांना आरक्षण देणार आहे, असे चारा घोटाळ्यातील आरोपी आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते लालूप्रसाद यादव यांनी सांगितले. याचा अर्थ संपूर्ण आरक्षण कोणाकडे आहे, तर एससी, एसटी, ओबीसी, गरीब यांच्याकडे आहे. आता ते (काँग्रेस – इंडिया आघाडी) म्हणतात की, संपूर्ण आरक्षण हिसकावून मुसलमानांना देणार आहेत. आपल्या वोट बँकसाठी ते हे काम करणार आहेत. जे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी रोखले होते, तेच पाप काँग्रेस आणि आघाडीतील पक्ष करणार आहेत, भाजप कोणत्याहीप्रकारे घटनेत बदल करणार नाही, असे म्हणत इंडिया आघाडीवर बोचरी टीका पंतप्रधान मोदी यांनी नगर आणि बीड येथील सभेत केली, तसेच भाजप आणि मित्रपक्ष यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
“निळवंडे”मुळे हजारो एकर शेती पाण्याखाली येणार
स्व.खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे दूरदृष्टी होती, त्यांनी चांगले काम केले, तसेच नगर जिल्ह्यातील निळवंडे धारण बांधण्याचे काम १९७० साली सुरू झाले आहे. त्यावेळी धरण बनवण्यासाठी 8 कोटी किंमत होती त्याची किंमत आता 5 हजार कोटी झाली आहे. हे पाप काँग्रेसने केले आहे. निळवंडे धरणातून शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी आहे.आमच्या काळात ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
… तर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार : फडणवीस
2014 आणि 2019 ला याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्यापेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा झाली आहे. या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय झाला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले की, त्यांच्या आशिर्वादाने लवकरच जिल्ह्याचे नाव “अहिल्यानगर” होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना दिवसाची वीज देणार
निळवंडे धरणातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे. देशातील 4 महामार्ग नगर जिल्ह्याला जोडले आहेत. जिल्ह्यात 4 एमआयडीसी होणार आहेत. त्यांना मंजुरी देखील दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशिर्वादाने जिल्ह्याची ओळख औद्योगिक जिल्हा म्हणून होईल. येत्या काळात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत भाषण करताना म्हटले आहे.
याहीपुढे जिल्ह्याचा झपाट्याने विकास करणार : डॉ. विखे
जिल्यात सुमारे ४ MIDC मंजूर आहेत, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे, तर अनेक उद्योग देखील इथे येतील, शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विकास सुरु आहे, निळवंडे, नंतर साकळाई प्रश्न देखील येत्या काळात पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फंडाडणवीस याच्यामध्यातून मार्गी लावणार आहे. जनतेने मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करावे असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
अशा पद्धतीने केला सत्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महसूल तथा पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संतांची पगडी, गळ्यातील वारकरी पंचा, वीणा, ज्ञानेश्वरी तसेच धनगर पोशाखातील घोंगडी काठी देऊन सत्कार करण्यात आला.
पवार आणि ठाकरे याच्यावर टीका टाळली
देशात लोकसभेचे पडघम जोरात सुरु असताना गेल्या दोन टप्प्यातील मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे (sp) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यावर विविधप्रकारे टीका केली होती, मात्र आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असताना, मोदी यांनी या दोघांवर टीका करणे टाळले. त्यामुळे वंचितच अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पवार आणि ठाकरे यांचा पाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे सुरु असल्याचे म्हटले होते, त्याला संशय त्यायला आता कुठेतरी बाळ मिळतेय, कारण ४ जून नंतर काही जागा कमी निवडून आल्या तर या दोघांची गरज मोदी यांना सत्ता स्थापन करताना भासणार आहे. त्यामुळेच मोदी यांनी टीका करणे टाळले असावे.