खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे कमी पडणार नाही : कृषिमंत्री धनंजय मुंडे

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे कमी पडणार नाही : कृषिमंत्री धनंजय मुंडे
Mumbai – राज्यात यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असुन वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने सर्व पीके मिळून 24 लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरित केले असून आणखी 6 लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे तर उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरीत केले जाईल, असे नियोजन केले जात आहे. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मंत्रालयात कृषी विभागाच्या सचिवांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात कुठेही बी-बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी सेवकापासून ते कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी डोळ्यात तेल घालून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
टास्कफोर्स नेमण्यात येणार
दरम्यान सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल. बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावी, यासाठी मागील वर्षी प्रमाणे शासनाचा व्हाट्सअप क्रमांक 24 तासात सक्रिय करून शेतकऱ्यांना कळवण्यात येणार आहे.
दुसरीकडे कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट शब्दात सांगितले असल्याचे मंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.
या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव श्रीमती कुंदन, आयुक्त रावसाहेब भागडे, गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास श्री. पाटील, बी-बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोंदवले, महाबीजचे श्री. कलंत्री, कृषी विद्यापीठांचे बियाणे विभाग प्रमुख, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्ष व दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.