शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार : अजित पवार

शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार : अजित पवार
ajit pawar – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारने या घटनेची पाहणी आणि करणे शोधण्यासाठी नौदल आणि सरकार मिळून संयुक्त तांत्रिक समितीची स्थापन केली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसे असे स्मारक उभारले जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पुतळ्याच्या ठिकाणाची आणि किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुतळा नेमका कसा कोसळला याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या पाहणीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवादही साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकार याप्रकरणाची सखोल चौकशी करत असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.
राज्याला चव्हाणांच्या राजकारणाचा वारसा – पवार
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थकांमध्ये राडा झाला होता, यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. “ज्याचं त्याला कळलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असल पाहिजे, कसं राजकारण झालं पाहिजे, या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने तारतम्या बाळगलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी उत्साहाचा भरात येऊन काहीही करू नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या संस्कृतीनुसार आपण वागलं पाहिजे”, असं ते म्हणाले.